‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दि. 21 मार्च : “हिंदू समाजातील दोषांवर परिपूर्ण उपाय म्हणून डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ जरी मोठ्या सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असला, तरी ही प्रक्रिया अत्यंत स्वाभाविक आणि सामान्य आहे. खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या माध्यमातून घडणारी परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे संघ होय,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
भारतीय विचार साधनेच्या (भाविसा) ‘नाना थिटे सभागृहात’ आयोजित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री गिरीश प्रभुणे, लेखक अरुण करमरकर, ‘भाविसा’चे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, कार्यवाह काशिनाथ देवधर आदि मान्यवर उपस्थित होते. दिलीप क्षीरसागर, अरुण करमरकर आणि दिलीप करंबळेकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
सुनील आंबेकर पुढे म्हणाले, “डॉ. हेडगेवारांना केवळ राजकीय असहमती व्यक्त करायची असती, तर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला असता. मात्र, त्यांना व्यक्ती निर्माणातून आदर्श समाज उभा करायचा होता. केवळ चरित्रवान लोक निर्माण करून चालणार नाही, तर त्यांचे संघटन करणे आवश्यक होते. म्हणून संघाची सुरुवात केली. संघ समजून घेण्यासाठी मोठ्या वैचारिक भाषणांची गरज नाही; तो सर्वसामान्य स्वयंसेवकांच्या वर्तनातून सहज समजतो.”
पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले की, “भारताची विस्कळीत झालेली समाजव्यवस्था सांधण्याचे कार्य संघाने केले आहे. सर्वच क्षेत्रांतील अराष्ट्रीय विचार आणि वैचारिक गोंधळाची स्थिती संघामुळे दूर झाली. हिंदुत्व हा सर्वांना जोडणारा विचार असल्याचे आता सर्वांना उमजले आहे.” संघ हा केवळ हिंदूंसाठी नाही असेही ते म्हणाले.
लेखक अरुण करमरकर यांनी ‘स्वयंसेवक’ या शब्दाच्या मीमांसेवर प्रकाश टाकला. करमरकर म्हणाले, “शताब्दीच्या निमित्ताने ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या तीन शब्दांची मीमांसा करण्याचे काम आम्ही केले. माझ्या वाट्याला ‘स्वयंसेवक’ शब्दाची मीमांसा आली. माझ्या अध्ययनातून मी अजूनही ‘स्वयंसेवक’ बनण्याच्या मार्गावरच आहे.”
‘रिलिजन’मुळे धर्मावर अन्याय!
“पश्चिमेत ‘रिलिजन’च्या माध्यमातून मूळतत्ववाद जन्माला आला आणि चर्चने थेट राज्यकारभार हाती घेतला. त्यामुळे तिथल्या विचारवंतांनी सामाजिक परिवर्तनासाठी रिलिजनला नाकारले. दुर्दैवाने, तोच अनुभव भारतात लादण्याचा प्रयत्न झाला आणि ‘धर्म’ या संकल्पनेला रिलिजनला समानार्थी मानून दूर सारले गेले. भारतात ‘धर्म’ म्हणजे कर्तव्य आणि कल्याण होय. राज्यकारभार, शिक्षण, प्रशासन यांत धर्म नको, या विचारामुळे ही क्षेत्र चारित्र्यहीन झाली आहेत. आज पुन्हा लोक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धर्माची (कर्तव्याची) मागणी करत आहेत,” असेही सुनील आंबेकर यांनी नमूद केले.
डॉ. आफळे यांनी प्रास्ताविक केले, तर काशिनाथ देवधर यांनी आभार मानले.

