कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र!

मुंबई, दि. 24 फेब्रुवारी : एआयमुळे जागतिक बाजारपेठेत मोठा बदल घडत आहे. आपल्या शासनाने हा बदल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला असून, महाराष्ट्राला भविष्यसज्ज करण्याचा संकल्प आहे असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026’ या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. त्यावेळी ते बोलत होते. एआयचा व्यापक स्वीकार (Adoption) आणि या क्षेत्रात सक्षम व कौशल्यपूर्ण नवी प्रतिभा तयार करणे ही काळाची गरज आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले. यासंदर्भात मुंबईत एक कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव नॅसकॉमकडे मांडण्यात आला आहे.
राज्य शासन कृषी क्षेत्रासाठी एआयचा वापर करत असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी म्हणून ‘महाविस्तार AI’ हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे, जो शेतकऱ्यांना पिकांनुसार सल्ला देतो. तसेच अचूक हवामान अंदाज, कीड व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करतो आणि बाजारभाव व बाजारपेठेसंदर्भातील संकेतांची माहिती उपलब्ध करून देतो. याशिवाय, विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शनही केले जाते. या प्लॅटफॉर्मद्वारे शेती अधिक तंत्रज्ञानाधारित, माहितीसमृद्ध आणि सक्षम होण्यास मदत होत आहे.
पॉलिसी-लेड ग्रोथ हा राज्य शासनाचा मंत्र असून बिझनेस आणि त्याची गरज ओळखून आपले शासन पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

