जऊळके येथे शिक्षण संस्थाचालकांशी संवाद; संवेदनशील माणूस घडविणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट

जऊळके (ता. दिंडोरी), १० फेब्रुवारी : “संवेदनशील माणूस घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणातूनच गुणवत्तावान समाज निर्माण होतो आणि असा प्रगल्भ समाजच राष्ट्राला बलशाली बनवतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ उपजीविका म्हणून नव्हे, तर आत्मीयतेने या पवित्र कार्यात झोकून दिले पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
जऊळके येथील आर्मस्ट्राँग रोबोटिक्स अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि. मध्ये आयोजित शिक्षण संस्थाचालकांच्या स्नेहसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव आणि विभाग संघचालक नाना साळुंखे उपस्थित होते.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, “शिक्षण हा केवळ व्यवसायाचा किंवा अर्थव्यवस्थेचा विषय नसून, तो विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. शिक्षकांनी स्वतःमधील ‘गुरुजीपण’ हरवू देऊ नये. शाळेतील प्रत्येक घटकाचे प्रशिक्षण आवश्यक असून, शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षकांमध्ये कामाबद्दल आत्मीयतेचा भाव निर्माण केला पाहिजे.” यावेळी त्यांनी आपल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे उदाहरण देत, शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते किती महत्त्वाचे असते, हे विशद केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती देताना सरसंघचालक म्हणाले की, “संघ म्हणजे प्रतिक्रिया नाही, स्पर्धा नाही किंवा सत्तेची शक्तीही नाही. संघ हा देशाला मोठे करण्यासाठी आणि समाजाची एकता वाढवण्यासाठी आहे. शिस्तबद्ध आणि ध्येयासक्त समाज निर्माण करण्यासाठी गेल्या शतकापासून संघाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाने संघ समजून घेण्यासाठी एकदा संघात यावे.”
संस्कृती हाच समाजाचा स्वभाव :
समाजात ८० टक्के लोक हे अनुकरणातून शिकत असतात, असे नमूद करत डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले की, “आपल्या देशात अनेक भाषा आणि पंथ असले तरी ‘संस्कृती’ हाच आपल्या समाजाचा स्वभाव असला पाहिजे. वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांनी ज्याप्रमाणे देशासाठी समर्पण दिले, तीच समर्पणाची भावना आजच्या पिढीत रुजवण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रावर आहे.”

