
मुंबई, १ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हे विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारे एक दमदार पाऊल आहे.
या अर्थसंकल्पाद्वारे देशातील विविध क्षेत्रांना पुढील काही वर्षे दिशा, गती व निधी देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. यासह प्रत्येक ग्रोथहबला 5 वर्षे कोट्यवधी रुपये निधी देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला असून याचा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, कारण एमएमआर, पुणे, नागपूर या ठिकाणी नीती आयोगाच्या माध्यमातून ग्रोथहब तयार करण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पामध्ये मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडोरची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडोरमुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मागील वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला अधिक निधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते प्रकल्प, ॲग्री बिझनेस नेटवर्क, इकोनॉमिक क्लस्टर्स, महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन, उपसासिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण, मुंबई–अहमदाबाद हायस्पीड कॉरिडोर, मुंबई व पुणे मेट्रो प्रकल्प तसेच एमएमआर क्षेत्रासाठी ग्रीन मोबिलिटीसारख्या प्रमुख उपक्रमांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाढत्या शहरीकरणाला नियोजनबद्ध करण्याकरिता एकात्मिक विचार केला असून महाराष्ट्राला याचा फायदा होईल. तसेच उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती करण्याचे ध्येय या अर्थसंकल्पात आहे. केंद्र सरकार पायाभूत सुविधांमध्ये देखील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय व सिंचन या क्षेत्रांकरिता भरीव तरतूद केली आहे. तसेच महिला बचत गटासाठी बाजारपेठ तयार करण्याची योजना देखील आहे. भारत तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनणार असल्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

