शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचे नवे पर्व

राहुरी, अहिल्यानगर, दि. 15 मार्च : शेती क्षेत्राकडे गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. पायाभूत सुविधांमध्ये शाश्वत गुंतवणूक केल्यास शेतकरी संकटाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित 39 व्या पदवीप्रदान समारंभास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेती क्षेत्राला शाश्वत बनवण्यासाठी तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचा मंत्र दिला. शेती शाश्वत करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून या क्षेत्राला गुंतवणुकीकडे न्यावे लागेल. शेतीसमोर असलेल्या हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि ‘महा-विस्तार’ ॲपचे महत्त्व अधोरेखित केले. ‘ॲग्री स्टॅक’ तयार करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम असून 1 कोटी 30 लाख शेतकऱ्यांचा डेटा डिजिटल करण्यात आला आहे. एआयच्या वापरामुळे शेतीचा खर्च 25 टक्क्यांनी कमी होईल आणि उत्पादकता दुप्पट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला. त्यांनी नवीन कृषी स्नातकांना मातीशी नाते जोडून विज्ञानाच्या मदतीने शेतीचे भविष्य उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राबवलेल्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेमुळे भूजल पातळीत झालेली वाढ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेली जलसुरक्षा याबाबत माहिती दिली. ‘मागेल त्याला शेततळे’ आणि सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य बनले असून, जगातली सर्वात मोठी डिस्ट्रिब्युटेड सोलर योजना राबवण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी बहाल करून गौरविण्यात आले.

