
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘मुंबई क्लायमेट वीक’चे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ‘मुंबई क्लायमेट वीक’ भारतातील पर्यावरणीय कृतीसाठी समर्पित असे पहिले व्यापक व्यासपीठ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी एकत्र साध्य करता येते, हे सिद्ध केले आहे. भारताने 260 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता पार केली आहे. महाराष्ट्र 48 गिगावॅट क्षमतेसह देशात महत्त्वाची भूमिका बजावत असून 2030 पर्यंत 50% पेक्षा अधिक ऊर्जा हरित स्रोतांमधून निर्माण करण्याचे राज्याचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक कॉरिडॉरमध्ये नवीकरणीय ऊर्जा, शहरांमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी, सार्वजनिक वाहतुकीत EV, तसेच पूर नियंत्रण आणि क्लायमेट-स्मार्ट शहरी नियोजनावर भर देत आहे. पर्यावरणीय कृती गावागावांपर्यंत पोहोचवत हवामान अनुकूल शेती, जलव्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाधारित ग्रामीण मूल्यसाखळी निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

मुंबईमध्ये ‘ग्लोबल साऊथ’साठी ‘क्लायमेट फायनान्स गेटवे’ बनण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. शाश्वत पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीसाठी जागतिक संस्थांनी मुंबईसोबत भागीदारी करावी. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान यावेळी, ‘मुंबई क्लायमेट वीक’ निमित्त विशेष टपाल तिकिट तसेच ‘क्लायमेट इन द ग्लोबल साऊथ, ॲडव्हान्सिंग इनोव्हेशन अँड कलेक्टिव्ह ॲक्शन’ या थीम रिपोर्टचे प्रकाशन करण्यात आले. बदलत्या हवामानाचे आव्हान पेलण्यासाठी आणि शाश्वत विकासाचा मार्ग आखण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल. मुंबईला ‘क्लायमेट रेझिलिएंट’ बनवण्यासाठी सरकार आणि संस्थांचे हे एकत्रित प्रयत्न कौतुकास्पद ठरणार आहेत अशा भावना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.

