
मुंबई, 18 फेब्रुवारी : हा केवळ भूमिपूजन समारंभ नसून भारत, मुंबई आणि महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जागतिक व्यापार क्षेत्रातील बदलती परिस्थिती आणि पुरवठा साखळीच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर अशा काळात फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारत आणि महाराष्ट्राच्या सामर्थ्याचा ठोस पुरावा आहे. नवी मुंबई विमानतळ हे देशातील सर्वोत्तम व सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ ठरेल. फेडेक्सचे टर्मिनल सुरू झाल्याने या विमानतळाची क्षमता अधिक बळकट होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रातील कार्गो हाताळणी अधिक सक्षम होईल आणि विशेषतः मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक क्षमतेला मोठी चालना मिळेल. 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यात नवी मुंबई विमानतळाचा महत्त्वपूर्ण वाटा असेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कार्गो व ट्रान्सशिपमेंट हब हे आधुनिक व्यापाराचे प्रमुख घटक बनले असून लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी ही व्यवसाय वृद्धीसाठी अत्यावश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे देशातील लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यावर भर दिला जात असून अत्याधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून फेडेक्ससारख्या कंपन्या या प्रक्रियेला गती देतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई विमानतळावर अशा आणखी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात आणि हे विमानतळ देशातील सर्वोत्तम ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे संचालक जीत अदानी, फेडेक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम, फेडेक्स एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (आंतरराष्ट्रीय) रिचर्ड स्मिथ व इतर मान्यवर उपस्थित होते.


