
मुंबई, दि. 11 मार्च : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशाचे केंद्र आहे. या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा व प्लग-अँड-प्ले सुविधा निर्माण करण्यास महाराष्ट्र शासन प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. फडणवीस यांनी आज ’19व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन’च्या निमित्ताने आयोजित ‘सीईओ राऊंडटेबल’ येथे उपस्थिती दर्शविली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केमिकल इंडस्ट्रीचे भविष्य व विकासाची नवी दिशा स्पष्ट केली.

शिक्षण आणि उद्योग यांच्यातील समन्वयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष भर दिला. यासह उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आयटीआय (ITI) आणि इतर नामांकित शिक्षण संस्थांसोबत भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, केमिकल इंडस्ट्रीसाठी एक स्वतंत्र आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रातील उद्योजकांना निमंत्रित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यापूर्वी दरवर्षी वीज दरात 9% वाढ होत असे, मात्र आता नवीन नियमांनुसार पुढील पाच वर्षांत वीज दरात कोणतीही वाढ होणार नाही, उलट त्यात दरवर्षी 1.2% कपात होऊन एकूण 9% कपात होईल. तसेच, उद्योगांसाठी पर्यावरणाशी संबंधित परवानग्या आता अधिक पारदर्शक आणि वेगवान झाल्या असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी केमिकल इंडस्ट्रीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

