
मुंबई, दि. २७ फेब्रुवारी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वभाषेचा अभिमान शिकविला. मराठी भाषा शुद्ध आणि प्रमाणित व्हावी यासाठी त्यांनी शब्दकोश निर्माण करून एक प्रमाण भाषा समाजाला दिली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या परंपरेतून मराठी भाषेची समृद्ध यात्रा आपल्याला अनुभवता येते. ‘लीळाचरित्र’सारख्या आद्य ग्रंथातून मराठी भाषा अभिजात असल्याचे स्पष्ट होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीविषयी गौरवोद्गार काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित, ‘जावे विनोदाच्या गावा… उलगडूया अभिजात मराठी साहित्यातील विनोदाचे दालन’ कार्यक्रम आज विधानभवनात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेते हृषिकेश जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपस्थितांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. शिवाय अतिशय सुंदर, समर्पक आणि भावस्पर्शी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विधिमंडळाचे आभार मानले. कविता, गीते, अभिवाचन आणि विनोदाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विविध छटा उलगडणारा हा कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
पूर्वीच्या काळातील भाषणे व्यंगात्मक आणि विनोदी असत; मात्र दुर्दैवाने आज विनोदाला अस्मितेशी जोडले जाते, त्यामुळे त्यातील निखळ आनंद आणि मर्म हरवत असल्याची खंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील बोलीभाषेचा स्वतंत्र गोडवा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मराठी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, तिच्यातील अभिजात साहित्य, लोककला, लोकगीत आणि लोकनाट्य यांचा व्यापक प्रसार व्हावा, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. मराठी भाषेने दिलेल्या अमूल्य देणगीचे संवर्धन करून ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी ही ज्ञानभाषा म्हणून अधिक बळकट व्हावी आणि तिचे संवर्धन अखंड सुरू राहावे, असे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

