
पुणे, दि. 17 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे येथे ‘भव्य पदयात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार तसेच ‘माय भारत (मेरा युवा भारत)’ यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवकांचे मोलाचे योगदान आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक सेवाभाव तसेच शासकीय उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रभावना दृढ करणे, सामाजिक सलोखा वाढविणे, कला, संस्कृती व परंपरा जतन करणे, स्वच्छता व पर्यावरणाबाबत जनजागृती करणे तसेच राष्ट्रनिर्माणात मोलाचे योगदान देणाऱ्या महापुरुषांचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशान्वये पदयात्रेच्या नियोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सहाय्यक आयुक्त (क्रीडा) गोविंद दांगट, उपशिक्षणाधिकारी छाया महेंद्रकर, तहसीलदार श्वेता पवार, नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, अधीक्षक (क्रीडा विभाग) प्रदीप महाडीक, माय भारत-नेहरू युवा केंद्रचे प्रतिनिधी स्वप्निल शिंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी व सुरेश काकड, क्रीडा अधिकारी ज्योती सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
सदर पदयात्रेची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता शनिवारवाडा समोरील प्रांगणातून होणार आहे. या पदयात्रेमध्ये सुमारे 2000 ते 2500 महानगरपालिका व शिक्षण विभागाच्या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ढोल पथक, लेझीम पथक तसेच पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
पदयात्रा शनिवारवाडा येथून प्रारंभ होऊन एस.एस.पी.एम.एस. शाळेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सांगता होणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तसेच विविध पुरस्कारार्थी सहभागी होणार आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

