‘भारत को जानो’ स्पर्धेतून भारताचे अंतरंग उलगडले : डॉ.विजय भटकर

२५ वी अखिल भारतीय ‘भारत को जानो’ स्पर्धा उत्साहात

दि. ११ जानेवारी, पिंपरी चिंचवड : भारत विकास परिषद आयोजित अखिल भारतीय ‘भारत को जानो’ ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांना भारताची विविधतेतील एकता व आपल्या महनीय भारताचे अंतरंग जाणून घेण्याची संधी आहे. भारतीय मूल्यांवर विश्वास ठेऊन, ध्येय ठरवून सातत्याने त्या दिशेने चालत राहिल्यास भारताचे सक्षम, संस्कारित नागरिक तयार होणार असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण ‘सी डॅक’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय भटकर यांनी केले ते पिंपरी चिंचवड मधील भोसरी क्वालिटी सर्कल एक्सेलन्स सभागृहात भारत को जानो स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.

भारत विकास परिषदेतर्फे आयोजित २५ व्या अखिल भारतीय भारत को जानो स्पर्धेचे आयोजन (रविवार दि.११ रोजी) नुकतेच करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन व भारत माता, स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजनाने झाली यावेळी भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन, क्षेत्रीय अध्यक्ष एल. आर. जाजू, भारत विकास परिषदेचे मुकेश जैन, अभय चौकसी, मंजुषा गोगटे उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी सुरेश जैन यांनी राष्ट्रनिर्माणात विद्यार्थांचे योगदान महत्वाचे असून भारताला वेगाने सर्वंकष विकसित करण्यासाठी संस्कारित, चारित्र्यवान पिढी काळाची गरज असल्याचे सांगून भारत विकास परिषद सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करीत असल्याचे सांगितले.

या स्पर्धेत भारतातील १६,००० शाळांमधून २० लाख विद्यार्थांनी भाग घेतला होता. त्यातील प्रत्येक गटातून विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा पार पडली. बक्षीस वितरण सोहळ्याला पद्मभूषण डॉ. विजय भटकर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संचालक डॉ. नवीन कुमार यांचे सह किशोर गुजर, विनोद लाठीया, चंद्रशेखर घुसे, विनोद बन्सल, श्रीनिवास चनशेट्टी, सुनीत ओक, मीनाक्षी पाटणकर, नरेंद्र पेंडसे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ. नवीन कुमार यांनी आपला भारत देश प्राचीन विविध भाषा, भूषा, संस्कृतीने नटलेला उज्वल भवितव्य असलेला देश आहे जगातील ७०% लस भारतात होते व तब्बल ४० देशांना आपण पुरवठा करीत असल्याचे सांगून व्यक्तिगत प्रगतीसोबत राष्ट्रीय विचार ठेवून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्पर्धेत झालेल्या विविध फेऱ्यांचे संचालन संदीप वाटस, राहुल जैन, पवन गौतम, अशोक चौधरी, बी बी जुनेजा, रणजीत नंबीसन यांनी तर आभार दर्शन दुगड यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

https://www.facebook.com/share/p/17jNgwFmbH/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *